अयं निजः परो वेति गणना लघुचेतसाम्
- Akhand Jyoti Magazine
- Jul 10, 2021
- 2 min read
उच्च चारित्र्य असणे ही विकसित व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख आहे. चारित्र्य म्हणजे काय ? तर सद्गुणांचा समुच्चय. सद्गुणांचे किती चांगले सत्परिणाम होतात याची सर्वांनाच ओळख आहे. मग त्यांचा उपयोग करण्यात काय अडचण आहे? आणि त्यांचा उपयोग करून त्या अडचणीतून मार्ग का काढता येत नाही? याचे उत्तर एकाच शब्दात देता येऊ शकण्यासारखे आहे. ते म्हणजे आपल्या व्यक्तिमत्त्वाचे स्व-केन्द्रित होणे. स्वत:ला एका लहानशा सीमेमध्ये बांधून घेऊन आपल्या जवळपासच्या लोकांवर, आपल्या संपर्काच्या क्षेत्रात आपल्या विशिष्ट आचरणाचा, व्यवहाराचा काय परिणाम होतो, त्याची काय प्रतिक्रिया होते, इकडे लक्ष न देता फक्त आपल्याच स्वतःच्या संतोषापुरते, आपल्याच सुखापुरते, सुविधेपुरते व प्रसन्नतेपुरते बघत राहणे हेच त्यामागचे कारण होय. नीतिनियमांची गोष्ट ऐकण्यापुरती, वाचण्यापुरती त्यांना भली वाटते, पण त्यानुसार वागण्याची मात्र त्यांची तत्परता दिसून येत नाही. ते क्षुद्र स्वार्थाची, स्वतःपुरती, स्वतःला जी सोयीची वाटते तेवढीच गोष्ट पक्की धरून ठेवतात. त्यामुळे कुणाचे कितपत हित होते की अहित होते इकडे पाहण्याची त्यांना गरज वाटत नाही.
सद्गुणांचा वापर करण्यामागे सामाजिक दृष्टिकोन असणे जरूरीचे आहे किंवा ते सामाजिक दृष्टिकोनातूनच प्रगट होतात असे म्हणता येऊ शकेल. ही अनुभूती घ्यायची म्हणजे स्व:ला विस्तृत बनवायला हवे. तेव्हाच आपण कुणा एका विराट पुरुषाचे अंग आहोत ही जाणीव होऊ शकते. आपला स्वार्थ हा सार्वजनिक स्वार्थाशी, परमार्थाशी अविच्छिन्न रूपाने निगडित झालेला आहे हे कळून येते. संपूर्ण शरीर जर ठाकठीक असेल, निरोगी असेल, समर्थ असेल तरच त्यात प्रत्येक अवयवाचे सुख आहे, सार्थक आहे, हित आहे. एरवी जर एकच अंग सुदृढ़ असेल, निरोगी असेल व बाकी शरीर जर रोगाने ग्रस्त झालेले असेल तर त्यापासून कुणाचेच भले होऊ शकणार नाही. असा व्यापक विचार करणारे समष्टीचे नुकसान करून स्वतःचा तेवढा स्वार्थ साधण्याचा विचार करीत नसतात. हाच तो विचाराचा केन्द्र बिन्दू आहे. इथूनच समाजात अनेक प्रकारच्या सत्प्रवृत्तींचा आविर्भाव होत असतो व त्यांचे पोषण, अभिवर्धन होत असते.
- पं. श्रीराम शर्मा आचार्य मे 2009 अखण्ड ज्योती (मराठी)
Comentários